वीट भट्टी वरील अपहरण झालेल्या मुलींचा २८ तासात शोध,अत्याचार करणा-या आरोपींना अटक

वीट भट्टी वरील अपहरण झालेल्या मुलींचा २८ तासात शोध,अत्याचार करणा-या आरोपींना अटक
नेवासा तालुक्यातील पानेगाव येथील वीट भट्टी वरून एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार करणा-या आरोपींला सोनई पोलीस पथकाने अवघ्या १८ तासात पकडुन अल्पवयीन मुलींची सुटका केली आहे. तर अपहरण करणाऱ्या आरोपीला तसेच त्याला मदत करणाऱ्या मित्राला देखील पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सोनई पोलीस ठाण्यामधे गुन्हा दाखल होताच साहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांनी १८ तासाच्या आत तपासाची वेगवान चक्रे फिरवत दोन्ही मुलींचा शोध घेऊन मुलींची सुटका केल्याने पानेगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.
पानेगाव परिसरातील एका वीट भट्टीवर काम करणाऱ्या दोन मजुराच्या अल्पवयीन दोन मुलींचे कुणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून अपहरण केल्याची घटना घडली होती. एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
याप्रकरणी शुक्रवारी सकाळी सोनई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे, पोलीस नाईक बाळासाहेब तागड, पोलीस काॅ.प्रविण शिरसागार, पोलीस मृंत्यजय मोरे, पोलीस ना रूपाली धामोरे आदिंच्या पोलिस पथकाला तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शिर्डी परिसरात रवाना करण्यात आले. राहता-शिर्डी शिवारात शोध घेतला असता दोन्ही अल्पवयीन मुली दोन आरोपींसमावेत मिळुन आल्याने तात्काळ मुलिंची सुटका करून त्यांना नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर अक्षय तुकाराम माळी (वय२४) राहणार शिरेगाव तालुका नेवासा, मधुकर बर्डे (वय २७) राहणार वडवाग लांडगा ता. संगमनेर यांना अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन आरोपीला पोलीसांनी ताब्यात घेण्यात आले आहे.
सोनई पोलीस पथकाने सदरची कामगिरी जलद गतीने केल्याने पानेगाव ग्रामस्थांच्या वतीने उपसरपंच दत्तात्रय घोलप, पोलीस पाटील बाबासाहेब जंगले यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांचा सत्कार केला आहे.