“जयंती वराह देवाची, गर्जना हिंदुत्वाची”

“जयंती वराह देवाची, गर्जना हिंदुत्वाची”
श्रीरामपूर(प्रतिनिधी):- हिंदू धर्मातील विविध सण उत्सव आणि धार्मिक परंपरांना विषेश महत्व असून या परंपरेच्या माध्यमातून समाजामध्ये एकोपा, संस्कृतीची जपवणूक आणि धार्मिक भावनेची वृद्धी होत असते.याच धार्मिक भावनेने रविवारी दिनांक १३ रोजी श्रीरामपूर शहरात मोठ्या उत्साही वातावरणात वराह जयंती साजरी होणार असून प्रत्येक हिंदूंनी वराह मिरवणुकीत सामील होण्याचे आवाहन सकल हिंदू समाजच्यावतीने करण्यात आले आहे.
“जयंती वराह देवाची, गर्जना हिंदुत्वाची” हे घोषवाक्य घेऊन सकल हिंदू समाज श्रीरामपूर च्या वतीने यंदाची वराह जयंती मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्याचा मानस ठेवला आहे.गोंधवणी येथील महादेव मंदिर येथून वराह देवाची सवाद्य अशी भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून शहरातील श्रीराम मंदिर चौक या ठिकाणी मिरवणुकीचा समारोप होणार आहे.
भगवान विष्णूच्या दहा अवतारांपैकी तिसरा अवतार वराह अवतार मानला जातो. हिरण्यकश्यपू या असुराने पृथ्वीला रसातळात नेल्यानंतर भगवान विष्णूंनी वरहाचे रूप धारण करून पृथ्वीचे रक्षण केले अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे वराह जयंतीला हिंदू धर्मात विशेष धार्मिक महत्व आहे.या दिवशी भगवान वरहाची पूजा,नामस्मरण आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजनाबरोबरच वराह देवाची भव्य मिरवणूक काढण्यात येते.
वराह अवताराच्या कथेतून धर्माचे रक्षण, अधर्माचा नाश आणि संकटाच्या काळात समाज व सृष्टीच्या रक्षणासाठी पुढे येण्याचा संदेश मिळतो.त्यामुळे वराह जयंती हा केवळ धार्मिक उत्सव न राहता आपल्या संस्कृतीशी आणि हिंदू परंपरेशी जोडणारा दिवस म्हणून साजरा व्हावा असे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.



