टाकळीभान—बेलपिंपळगाव रस्त्याची दैना फिटणार तरी कधी? ग्रामस्थांचा लोकप्रतिनिधी व प्रशासनाला सवाल

टाकळीभान—बेलपिंपळगाव रस्त्याची दैना फिटणार तरी कधी? ग्रामस्थांचा लोकप्रतिनिधी व प्रशासनाला सवाल
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील महादेव मंदीरापासून ते बेलपिंपळगांवकडे जाणार्या रस्त्याची दैना फिटणार तरी कधी?असा सवाल पंचक्रोशीतील ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे.
टाकळीभान येथून बेलपिंपळगावसह इतर गावांना जोडणारा जवळचा रस्ता म्हणून या रस्त्याकडे बघितले जाते. सदर रस्ता हा महादेव मंदीरापासून ते टाकळीभान शिव(बल्हई नाला) पर्यंत अंत्यत खराब झालेला आहे. टाकळीभान गावाची बाजारपेठ मोठी असल्याकारणाणे पंचक्रोशीतील नागरीकांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राबता असतो. दळणवळणाच्या दृष्टीने रस्त्याला अनन्यसाधारण महत्व आहे. मात्र येथे या रस्त्याची वाताहत झालेली आहे. या रस्त्याने प्रवास करताने नाकीनऊ येतात. अनेक वेळेस रस्त्याच्या दुर्दशेमुळे छोटे—मोठे अपघात या ठिकाणी घडून अनेकांना कायमचे अपंगत्वही आलेले आहे. असे असतानाही आतापर्यंत वारंवार या रस्त्याच्या दुर्दशेबाबत वर्तमान पत्रातून वृत्त प्रसिध्द झाले. मात्र तरीही संबधीत विभागाला अथवा जाग आली नाही. ऐरवी मताचा जोगवा मागण्यासाठी घरोघरी येरझर्या मारणार्या राजकारण्यांना मात्र आता या रस्त्याचा जणू काही विसरच पडला आहे. अशा स्वरूपाच्या संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त केल्या जात आहे.
शेजारील नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव या ठिकाणाहून शिवापर्यंत हा रस्ता त्या तालुक्यातील लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या माध्यमातून झाला आहे. मात्र टाकळीभान मधून जाणार्या या रस्त्याची अवकळा कधी हटणार? असा प्रश्न समोर उपस्थित केला जात आहे. या रस्त्याने प्रवास करताने वाटसरू बेजार झाले असून लवकरात लवकर लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून या रस्त्याचे काम करण्यास संबधित विभागाला भाग पाडावे. अन्यथा येणार्या सर्वच निवडणूकीत मतदानाचा जोगवा मागायला येणार्या पुढार्यांना याचा जाब विचारला जाणार असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.
अशीच परिस्थिती टाकळीभान—कारेगाव रस्त्याची झालेली आहे. सदर रस्त्याने प्रवास करताने नागरीकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तरी टाकळीभान—कारेगाव रस्त्याचेही काम मार्गी लागावे अशी मागणी जोर धरत आहे.
कुणी कुणासाठी वैयक्तीक लाभाची मागणी या ठिकाणी करत नसून सार्वजनीक हिताची ही बाब आहे. दळणवळणासाठी रस्ता हा महत्वाचा आहे. रस्ते चांगले असेल तर गावाची बाजारपेठ फुलली जाते. अन्यथा गावात येण्याचे रस्तेच जर धड नसतील तर बाहेरून येणार्या ग्रामस्थांचे गावात येण्याचे प्रमाण निश्चीतच कमी होते. याचाच परिणाम आर्थिक उलाढालीवर होतो. याबाबत शंकाच नाही.