पावसामुळे_शाळेची_वाट_झाली_बिकट

पावसामुळे_शाळेची_वाट_झाली_बिकट
चिखलातून_रस्ता_शोधताना_ विद्यार्थ्यांची_तारेवरची_कसरत
दोन_तालुक्याला_जोडणारा_ खिर्डी_पाचेगाव_रस्ता_नेहमीच_ दुर्लक्षित
खिर्डी : पावसाळ्यात अदृश्य होणाऱ्या खिर्डी-पाचेगाव रस्त्यातून वाट शोधत शाळेपर्यंत पोहचण्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींना करावी लागणारी तारेवरची कसरत आजही सुरूच आहे. नव्वदच्या दशकात आम्ही पाच किलोमीटर अनवाणी पायाने शाळेत जायचो. आता काळ बदलला. विद्यार्थांना सायकली आल्या. अनवाणी पायाने तुम्हाला कोणी दिसणार नाही. विद्यार्थ्यांच्या पेहरावातही खूप बदल झाला. मातीची घरे नामशेष होऊन पक्की घरे झालीत. मात्र, दुर्दैवाने बदलला नाही तो दोन तालुक्याला (श्रीरामपूर-नेवासा) जोडणारा खिर्डी-पाचेगाव रस्ता. नुकताच गावाला गेलो होतो. भावाचा मुलगा मयूर पळत माझ्याकडे आला अन म्हणाला, “नाना, आमच्या शाळेचा रस्ता लई बेक्कार झालाय. आम्हाला शाळेत जाता येत नाही, त्याची बातमी लावा ना.” एका लहान मुलाला देखील आपल्या अडचणी बातमीतून मांडाव्या वाटतात. त्यावरून त्याला होत असलेल्या त्रासाची सहज कल्पना येते. आमच्या काळात तरी तो खिर्डी-पाचेगाव रस्ता बरा होता इतकी दुर्दशा आता त्या रस्त्याची झाली आहे. काय_तो_चिखल..! काय_ते_खड्डे..! काय_ती_रस्त्यावरील_डबके..!आणि_काय_ती_चिखलाची_झालेली_बिरबटी..! कुठेही_ठिक_नसलेल्या_रस्त्याचे_हे_वास्तव_सत्य…!
दोन तालुक्याला जोडणारा हा पाच किलोमीटरचा रस्ता आजपर्यंत दुर्लक्षित राहिलाय. आमदारनिधीतून किंवा खासदारनिधीतून हा रस्ता आतापर्यंत व्हायला हवा होता. कारण पाचेगाव हे गाव पंचक्रोशीतील दळणवळणाचे मुख्य गाव होय. आठवडा बाजार, दवाखाना किंवा शेतीविषयी वस्तूंसाठी देखील पंचक्रोशीतील गावकऱ्यांना याच गावात जावे लागते. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांप्रमाणेचं नागरिकांसाठीही हा रस्ता होणे गरजेचे आहे.
सायकल चिखलात जॅम झाल्याने अनेक वेळा विद्यार्थ्यांना शाळेत वेळेत पोहचता येत नाही. काही मुलं-मुली चिखलातून वाट काढताना सायकल घसरून पडतात. कपडे खराब झाल्यामुळे त्यांना अर्ध्या रस्त्यातून परत घरी यावे लागते, असे प्रकार नित्याचे झाले आहेत. विद्यार्थी हे आपल्या देशाचे उद्याचे भविष्य आहेत, असं नुसतं म्हणून उपयोग नाही. किमान त्यांच्या ज्ञानमंदिरापर्यंत जाण्याच्या मार्गाचा तरी जिर्णोद्धार व्हायला हवा. लोकप्रतिनिधींनी विद्यार्थ्यांशी निगडीत असलेल्या या प्रश्नांची गंभीरपणे दखल घ्यायला हवी. चांगला रस्ता ही आता काळाची गरज बनली आहे. गावातील देवालये, सभामंडप, हरिनाम सप्ताह, जिम या गोष्टीही महत्वाच्या आहेतचं. मात्र, त्यापेक्षाही महत्वाचे आहे ते म्हणजे ज्ञानमंदिरापर्यंत जाणारे रस्ते… बघा पटतंय का..?
समस्त ग्रामस्थ खिर्डीकरांच्या वतीने आमदार ,खासदार ,पंचायत समिती ,जिल्हा परिषद ,अशा एखाद्या निधीतून रस्त्या करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.