खिर्डीतील गायरान जमिनीवर अतिक्रमण; तहसीलदारांकडे तक्रार

खिर्डीतील गायरान जमिनीवर अतिक्रमण; तहसीलदारांकडे तक्रार
श्रीरामपूर (प्रतिनिधी) – श्रीरामपूर तालुक्यातील खिर्डी गावाच्या हद्दीतील सरकारी गायरान जमिनीत रहिवासी घरे बांधून तसेच दफनभूमी म्हणून वापर करून अतिक्रमण करण्यात आल्याची तक्रार भारतीय जनता पक्षाचे तालुका चिटणीस अनिल चितळकर यांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले की, खिर्डी येथे गट क्रमांक सहा मध्ये गुरे चारणे, सर सरपंच ग्रामपंचायत खेरडी वांगी महाराष्ट्र शासन सरकार या नावाने जवळपास ३३ एकर (१३.६८ हेक्टर) सरकारी गायरान जमीन असून या जमिनीवर 5 ते 6 एकारामध्ये बेकायदेशीर रित्या एका समाजातील काही लोक अतिक्रमण करून वास्तव्यास आहेत. त्याचबरोबर या जागेचा वापर दफनभूमी म्हणूनही केला गेल्याचे दिसून येत आहे. या जमिनीत अलिकडेच काही मृतदेह दफन झाल्याचे दिसून येत आहे. दफन केलेले हे मृतदेह कोणाचे आहेत ? असा प्रश्न आहे.
कारण या समाजाची लोकसंख्या येथे अत्यल्प आहे. ग्रामसेवक श्री. डोंगरे यांच्या ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली मात्र त्यांच्याकडून दखल घेतली गेली नाही. या जागेचा नेमका कशासाठी वापर होत आहे याची चौकशी करून कार्यवाही करावी तसेच अतिक्रमणे काढून घ्यावीत. भविष्यात जातीय तेढ निर्माण होऊ नये म्हणून वेळीच दखल घेतली जावी, अशी अपेक्षाही श्री. चितळकर यांनी या निवेदनात व्यक्त केली आहे.