लोहार समाजातील कारागिरांनी आपले कौशल्य वापरुन उद्योग उभारावा : उदमले

लोहार समाजातील कारागिरांनी आपले कौशल्य वापरुन उद्योग उभारावा : उदमले
परंपरागत कौशल्याकडे न्यूनतेने पाहिले जाते. त्यामुळे अापले पारंपरिक उद्योग भांडवलदारांनी काबिज केले. लोहार समाजातील कारागिरांनी आपले कौशल्य वापरुन उद्योग उभारावा. शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. पीए विश्वकर्मा योजनेसाठी आपण लोहार समाजातील कारागिरांना मदत करू. लोहार समाजाने आता जागतिक विचार करावा, असे आवाहन सेवा निवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा भाजपचे नेते नितीन उदमले यांनी केले.
अहमदनगर जिल्हा विश्वकर्मा विचारमंच (लोहार समाज) व नाशिक विभागीय लोहार शिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांतील १० वी, १२ वी, पदवीधर व पदव्युत्तर उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व नगर जिल्ह्यातील लोहार कारागिरांना पीएम विश्वकर्मा योजना व इत्तर योजनांचे मार्गदर्शन करण्यासाठी रविवार सीएसआरडी महाविद्यालयात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य सुभाष कौसे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी बाळासाहेब मुंडे , जिल्हा उद्योग केंद्राचे तात्यासाहेब जिवडे, इंडियन बँकेचे रोहित जवणे उपस्थित होते.जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी बाळासाहेब मुंडे म्हणाले, केंद्र सरकारच्या ‘पीएम विश्वकर्मा’ योजनेतून कारागिरांचे पारंपरिक कौशल्य टिकून व त्यातून आर्थिक उन्नती होणार आहे. या योजनेचा कारागिरांनी लाभ घ्यावा. या योजनेंतर्गत १८ प्रकारच्या पारंपारिक कारागिरांना आता बँकेतून अर्थसहाय्य मिळणार आहे. तीन लाखांपर्यंत कमी व्याजदराने मिळणाऱ्या कर्जाला कोणत्याही प्रकारची बॅंक गॅरंटी लागत नाही, हे योजनेचे वैशिष्ट्य आहे.जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी मुंडे म्हणाले, ‘पीएम विश्वकर्मा’ योजनेंतर्गत १८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना आता बँकेतून अर्थसहाय्य मिळणार आहे. कारागिरांना आवश्यक ते प्रशिक्षण तसेच निधी नसलेल्यांना सरकारी आर्थिक सहाय्य मिळेल. ग्रामीण कारागिरांना एक लाख रुपयांचे स्वस्त दरात कर्ज मिळणार. पहिल्या एक लाख रुपयांचा परतफेड कालावधी १८ महिन्यांचा तर दुसऱ्या दोन लाख रुपयांचा परतफेड कालावधी ३० महिन्यांचा असेल. कौशल्य मूलभूत प्रशिक्षण व प्रगत प्रशिक्षण मिळणार आहे. ही कारागिरांना सुवर्णभेट अाहे.
जिल्हा उद्योग केंद्राचे जिवडे म्हणाले, मुख्यमंत्री रोजगार कार्यक्रमाद्वोर १० हजार उद्याेजक घडावे हा उद्देश अाहे. या अंतर्गत सेवा उद्योगासाठी २० लाखांचे, तर उत्पादन उद्योगासाठी ५० लाखांचे कर्ज मिळते, त्यावर १५ ते ३५ टक्के अनुदान मिळते. उद्योग करण्यासाठी भांडवलासोबत ज्ञानही गरजेचे असते. महसूल अधिकारी अधिकारी राजेंद्र लाड यांनी जातीचे, रहिवास व इतर आवश्यक प्रमाणपत्र वेळेत काढून घेण्याचे आवाहन समाजातील विद्यार्थ्यांना व पालकांना केले.
प्राचार्य कौसे यांनी लोहार समाजातील मुलांनी उच्चपदस्थ व्हावे. अापण शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागास राहू नये. पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक हर्षल आगळे यांनी केले. त्यांनी विश्वकर्मा विचारमंचच्या कार्याची माहिती दिली. या विचारमंचच्या वतीने करिअर गाईडन्स तसेच शैक्षणिक व कारागिरांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या व्याख्यानांचे आयोजन करू, असे सांगितले. कार्यक्रमाला नगर, नाशिक, जळगाव, धुळे जिल्ह्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन शिक्षक संजय इघे यांनी, तर आभार अनिल हिवाळे यांनी मानले.
यावेळी लोहार समाजातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ ज्ञानेश्वर वैद्य यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल, विक्रीकर निरीक्षक गुरुप्रसाद लोहार, इंडियन बँकेचे व्यवस्थापक रोहित जवणे, एसटी महामंडळाचे सेवानिवृत्त अधिकारी रमेश लोखंडे, वसंतराव थोरात यांच्यासह विविध क्षेत्रातील गुणवंत ६० विद्यार्थ्यांचा पुष्प, प्रमाणपत्र व फाईल देऊन सत्कार करण्यात आला.