संपाला विरोध करणाऱ्या अज्ञानी युवकांसाठी*

*संपाला विरोध करणाऱ्या अज्ञानी युवकांसाठी*
आज संपात उतरलेला प्रत्येक कर्मचारी हा बहुसंख्य तृतीय किंवा चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी आहे. तसाही चतुर्थ श्रेणी कर्मचारी आता खासगीकरणाचा बळी पडल्याने केवळ तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांचा समावेश त्यात आहे.
सर्वसाधारण घरात जन्मलेला, शेतकरी, मजूर वर्ग कुटुंबात जन्म घेणारा, बालपणी गरिबीचे फटके सोशलेला, दहावी बारावी पासून चप्पल किंवा दोन जोडी कपडे मिळालेला, गरिबीवर मात करून, शिकून स्पर्धा परीक्षेच्या कसोटीला उतरून खरा ठरलेला हा तृतीय श्रेणी कर्मचारी आहे. अतिशय शांत, धीर गंभीर, आणि सहनशीलता जपणारा हा गट ओळखला जातो. आता कुठे नोकरीला लागून आपले, कुटुंबाचे स्वप्न पूर्ती करत आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करत शांतपणे जीवन जगणारा हा वर्ग आहे.
मात्र तरीपण प्रशासन, राजकारण आणि समाज यांच्या मध्ये सर्वात जास्त हाच गट पिसला जातो. केंद्राने जरी पत्रक काढले तरी राज्याने ते अंमलात आणावे किंवा नाही हे राज्यावर अवलंबून होते त्यामुळे कुण्या एका पक्षाने पेन्शन बंद झाल्याचे आरोप निष्फळ आहेत.
तृतीय श्रेणी कर्मचारी यांची संख्या खूप असल्याने तसेच यांचा समाजसंपर्क जास्त असल्याने निश्चितच यांचा पगार आणि भत्ते यांची माहिती समाजात कर्णोपकरणी असते आणि त्यामुळे एखाद्या कामचोर किंवा आळशी कर्मचार्यामुळे सर्वच कर्मचार्यांना धारेवर धरले जाते. त्यांचा जागोजागी उद्धार केला जातो. पगार काढला जातो.तुम्हाला एक सांगू इच्छितो हा तृतीय श्रेणी कर्मचारी अनेक अडचणीतून तापून निघालेला वर्ग आहे. आज अनेक स्वयंघोषित गल्ली नेते,
समाजसुधारक, तथाकथित सुशिक्षित बेरोजगार ढेरपोट्या गलेलठ्ठ पगाराच्या नोकरदारांना राजीनामे मागून त्यांच्या ऐवजी कमी पगारावर नोकरी करण्यास इच्छुक आहेत
तुम्ही स्वतः कमी पगारावर काम करण्यास इच्छुक असाल तर आपल्याच पायावर तुम्ही कुर्हाड मारत आहात. म्हणतात ना, “कुर्हाडीचा दांडा गोतास काळ” कारण तुमच्यामुळे शासनाला कळले आहे की, जनमाणसांत कवडीमोल अनेक मनुष्यबळ उपलब्ध आहे.
आणि म्हणूनच खासगीकरणाची वाट शासनाने पकडली आहे. तुमच्याकडून वारेमाप फी वसूल केली जाते, निकालही लागतात मग भरती करायला का विलंब? आहे याचे उत्तर? आता अनेक
शासकीय विभागात स्थानिक पातळीवर, गाव स्तरावर कंत्राटी पद्धतीने तोडक्या मानधनावर* कर्मचारी नेमले जात आहेत.
आज आम्ही तरी शासकीय नोकरीत आहोत तुम्ही आता विसरून जा, कारण तुमच्याचमुळे तुम्ही नोकरीपासून वंचित ठेवले जाणार आहात. तुमचे शिक्षक होण्याचे स्वप्न आता विसरून जा, तुम्ही ह्या बाजारात आता कवडीमोल भावात स्वतःला विकायला ठेवले
आहे याची ही फळे आहेत. तुमचा स्वाभिमान तुम्ही गहाण ठेवल्याने तुम्ही काहीही करू शकणार नाही. ना तुम्हांला स्थैर्य असेल, ना म्हातारपणात पेन्शन आणि याला करणीभूत तुम्ही आणि केवळ तुम्हीच असणार आहात.
१/११/२००५ नंतर सेवेत आलेला कर्मचारी रात्रंदिवस अभ्यास करून बुद्धीच्या जोरावर, स्पर्धेत उतरून आपली विद्वत्ता सिद्ध करून सेवेत आलेला आहे याची जाणीव असू द्या. हा उच्चशिक्षित व
स्वाभिमानी वर्ग आहे. आपल्या हक्कासाठी, घटनेने दिलेल्या अधिकाराखाली एकत्र येऊन संघटनेच्या माध्यमातून आपल्या न्याय्य मागण्या शासनदरबारी मागत असेल तर तो त्यांचा हक्क आहे.
अरे जोपर्यंत बाळ रडणार नाही,पाय आपटणार नाही तोपर्यंत आई त्याला दूध कशी देईल. हा हट्ट यांनी कुणाकडे करायचा ?मित्रहो, आज तुम्ही संपात उतरलेल्या कर्मचार्यांच्या विषयी छी, थू करत दात विचकत आहात
ते तुमच्याच कुटुंबातील कुणीतरी आहेत. तुमचे लहान मोठे बहीण भाऊ असतील, काका काकू, मामा मामी, स्नेही स्वजन किंवा इतर कोणत्याही नात्यातील असतीलच असतील.
त्यांच्याविषयी तुमच्या मनात एवढा द्वेष ! त्यांचा एवढा राग ! कमाल आहे तुमची. तेही सोडा, आज संपात उतरलेला हा वर्ग तुमच्याच भविष्याविषयी संपात उतरलाय ! जाणीव असू द्या.
ज्या कर्मचार्यांना जुनी पेन्शन लागू आहे तेही स्वयंस्फूर्तीने नव्या पेन्शन वाल्यांच्या खांद्याला खांदा लाऊन आपल्या लहान बांधवांच्या हक्कासाठी ढालीप्रमाणे उभा ठाकलेला आहे. आज ते शासकीय सेवेत आहेत,
उद्या तुम्ही असाल. तेव्हा तुमचे उद्याचे भविष्य ह्या संपातून कायम राखले जाणार आहे. हा संप ऐतिहासिक ठरणार आहे. आज हे कर्मचारी संपात उतरलेत पण त्याची गोड फळे
तुम्हाला,तुमच्या मुलांना, मुलींना चाखायला मिळतील.
एक महाशय ह्या कर्मचार्यांना ढेरपोटे म्हणत होते. अरेरे ! ही असली किळसवाणी तुमची मानसिकता.
अरे हे ढेरपोटेच इमानइतबारे लाखभर रूपयांचा इन्कमटॅक्स शासनाकडे भरतात त्याच पैशातून तुमच्यासाठी २ रुपये किलोचा तांदूळ, गहू तुम्हाला शासन उपलब्ध करून देतो. ह्याचे भान ठेवा.
हीच वेळ आहे, सावध व्हा ! सुशिक्षित झालात मात्र साक्षर व्हा !
आपले स्वतःचे भांडवल होऊ देऊ नका. एखाद्या राजकारण्याने पाठीवर हात ठेवला तर आयुष्यभराचा आपला स्वाभिमान त्याच्या चरणी अर्पण करू नका. तुम्ही नोकरीला नाही लागला असाल तुमची मुले, मुली नातूह्या स्पर्धेत असणारच आहेत.
दूरदृष्टीकोणातून विचार करा. डोळस व्हा !
एवढही होत नसेल तर संपात उडी घेतलेल्या आणि आपल्या हक्काची लढाई लढणार्या कर्मचार्यावर दात विचकू नका.