समाज प्रबोधन करणार्या कलावंताच्या समस्यांचे शासनाने सोडवणूक करावी—प्रतिष्ठीत कलावंत प्रतिष्ठाण.

समाज प्रबोधन करणार्या कलावंताच्या समस्यांचे शासनाने सोडवणूक करावी—प्रतिष्ठीत कलावंत प्रतिष्ठाण.
आपल्या कलेच्या माध्यमातून समाज जागृतीचे व समाजप्रबोधनाचे काम करणारे लाखो कलावंत आहेत. यामधील बहुतांशी कलाकारांना विविध समस्यांचा सामना सध्यस्थितीत करावा लागत आहे. त्यांना भेडसावणार्या या विविध समस्यांकडे शासनाने लक्ष देवून सोडवणूक करावी अशा आशयाचे निवेदन नूकतेच प्रतिष्ठीत कलावंत प्रतिष्ठाणच्या वतीने मुख्यंमंत्री, सांस्कृतीक मंत्री व तहसीलदार श्रीरामपूर यांना देण्यात आले आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, समाज प्रबोधनाचे कार्य करणार्या कलावंतावर सध्या उपासमारीची वेळ आली असून विविध समस्यांनी तो ग्रासला गेला आहे. मध्यंतरीच्या काळात कोरोना महामारी, नोटबंदी आदीमुळे कलाकारांचा उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला. शासनाने त्यांना आर्थिक सहाय्य ५०००/ देण्याचे ठरविले होते. मात्र ती रक्कम सुध्दा आजपावेतो या लोककलावंताना मिळाली नाही. त्यामुळे अनेक कलावंत हलाखीचे जीवन जगत आहे. उपासमारीमुळे उदरनिर्वाहासाठी व कलेसाठी वापरले जाणारे साहीत्य विकण्याची वेळ त्यांच्यावर आली असून काहींनी कर्ज घेतले आहे. मात्र शासनाकडून आश्वासनापलीकडे काहीही मिळत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शासनाने या कलावंताकडे जातीने लक्ष देवून त्यांच्या मागण्या पुर्ण कराव्यात अशी मागणी निवेदनातून केली आहे. या मागण्यामध्ये वृध्द कलावंताच्या मानधन योजनेत बदल करणे, मानधन सरसकट ५०००/ करावे व पात्रतेची वयोमर्यादा ४५ वर्ष करावी, उत्पन्न मर्यादा १ लाख करावी, लाभार्थी निवड संख्या २०० करावी, म्हाडासह सर्व घरकुल योजनेचा लाभ कलावंताना प्राधान्याने द्यावा, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये गरजू, गरीब, वंचित कलावंताना आवश्यक ते वाद्य साहीत्य देण्याची योजना आखावी, इतर महामंडळाच्या धर्तीवर कलावंतासाठी कल्याण मंडळ स्थापन करावे, ग्रामपंचायत पासून ते लोकसभेपर्यंत कलावंताना राजकीय आरक्षण देण्यात यावे, आमदार निधीतून तालुक्याच्या ठिकाणी सांस्कृतीक भवन बांधण्यात यावे, वाघ्या मुरळी व इतर कलावंत या व्यावसायीक कलावंताना कलावंताचा दर्जा देण्यात यावा, एस.टी.बसमध्ये प्रवास सवलत देण्यात यावी, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये कलाक्षेत्रातील कलावंताच्या नावाची नोंदणी करून त्यांना अधिकृत ओळखपत्र देण्यात यावे. अशा स्वरूपाच्या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहे. वरील सर्व समस्यांचे १० नोंव्हेबर २०२२ पर्यंत निराकरण करण्यासाठी प्रयत्न करावे, अन्यथा १० नोव्हेंबरच्या पुढे राज्यामध्ये कलावंताच्या समस्या संदर्भात आंदोलने करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनावर सीताराम बा.डोईफोडे, विक्रम ल.सोनवळे, बाबासाहेब भा.गायकवाड, वसंतराव बा.गावडे, सर्जेराव चामुटे यांच्या सह्या आहे.