हिरवळीने नटलेला प्रसिद्ध कपिलधार धबधबा फेसाळला, पर्यटकांची मोठी गर्दी*

*हिरवळीने नटलेला प्रसिद्ध कपिलधार धबधबा फेसाळला, पर्यटकांची मोठी गर्दी*
मागील दोन आठवड्यात जिल्ह्यात दमदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील कपिलधार धबधबा ओसंडून वाहू लागला आहे. हिरवळीने नटलेल्या निसर्गरम्य परिसरातील हा धबधबा सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. धबधबा फेसाळला असून पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. श्री मन्मथ स्वामींचे समाधी स्थळ असलेल्या कपिलधारची ओळख महाराष्ट्रातच नव्हे तर परराज्यात देखील आहे. बीड तालुक्यातील कपीलधार हे क्षेत्र वीरशैव समाजाचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी मन्मथस्वामी यांची संजीवन समाधी आहे. जुलैच्या सुरूवातीपासून झालेल्या पावसाने जिल्ह्यातील बरेच नदी नाले ओसांडून वाहू लागले आहेत. यातच निसर्गाच्या सौंदर्यात भर टाकणारे धबधबे देखील खळखळून वाहत आहेत. कपिलधार धबधबा उंचावरून कोसळत असल्याने या ठिकाणी पर्यटक तसेच भाविकांची गर्दी उसळत आहे.
उंच कड्यावरून दरीत झेपावणारा हा जलप्रपात पाहण्यासाठी बीड जिल्ह्यासह बाहेरील देखील पर्यटक गर्दी करू लागले आहेत. कपिलधार महाराष्ट्रातील वीरशैव समाजाचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणा संत शिरोमणी मन्मथस्वामी यांची संजीवनी समाधी आहे. या समाधीला 459 वर्षे पूर्ण झाली आहेत.
याच परिसरात धबधबा असून तो पर्यटकांना आकर्षित करून घेतो. विशेष म्हणजे पर्यटन विभागाचा ‘ब’ दर्जा देखील या ठिकाणाला प्राप्त झाला आहे. पावसाळ्यामध्ये या पर्यटनस्थळाला मोठी गर्दी पहायला मिळते. स्वामी हे मूळचे निंगुर येथील.
निवासी माता पार्वती आणि शिवलिंग स्वामी यांच्या उदरात मन्मथ स्वामींचा जन्म झाला. मन्मथ स्वामी यांनी मानूर मठ येथे बसवराज शिवाचार्य महाराज यांच्या अंतर्गत विद्या अभ्यास पूर्ण केला. वीरशैव धर्माचा प्रचार स्वामींनी महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक अशा राज्यात केला. श्रावण महिन्यात यात्रा कार्तिकी पौर्णिमेला या ठिकाणी मोठा धार्मिक महोत्सव असतो.
महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश येथून लाखो भाविक या उत्सवासाठी येतात. माघ शुद्ध पंचमीला स्वामींचा जन्मोत्सव असतो. तर फाल्गुन चतुर्थीला समाधीस्थ झालेला दिवस असतो. श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी या ठिकाणी मोठी यात्रा असते.
मंदिराची दिनचर्या मंदिर सकाळी 5 वाजता दर्शनासाठी खुले केले जाते. सकाळी महापूजा असते. महापूजा दरम्यान महाभोग असतो. यात श्रीफळ, भात अशा प्रसाद दाखवला जातो.
दुपारी 12 ला आरती होते. त्यानंतर 35 ते 40 किलोचा भात भाविकांसाठी प्रसाद म्हणून दिला जातो. संध्याकाळी 5 ते 7 शिवपट आणि शिव भजन होते. रात्री दहा वाजता मंदिर बंद केले जाते.
पाहा मंदिरापर्यंत कसे पोहोचाल
कपिलधार देवस्थान हे धुळे सोलापूर राज्य महामार्ग लगत मांजरसुंबाच्या घाटाच्या प्रारंभास आहे. यासाठी तुम्ही मुंबईहून येत असाल तर 470 किलोमीटर अंतर आहे. पुण्याहून येत असाल 320 किलोमीटरचे अंतर आहे. औरंगाबादमधून येत असाल, तर 170 किलोमीटरचे अंतर आहे.
मागील पन्नास वर्षापासून कपिलधार देवस्थानाला भारतभरातून भाविक भक्त येतात. या ठिकाणी होणाऱ्या धार्मिक महोत्सवासाठी देशभरातून 50 ते 60 वेगवेगळ्या दिंड्या दाखल होतात. या दिंडीतील भक्तांच्या निवासाची व्यवस्था आम्ही करतो. भक्तांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतो.
केंद्राने दिलेल्या निधीतून मंदिर परिसरात सोपवे देखील बसवण्यात येणार असल्याचे मंदिर व्यवस्थापक त्र्यंबक स्वामी यांनी सांगितले. मंदिरात नागनाथ स्वामी पुजारी आहेत. देवस्थानाचा संपर्क क्रमांक 02442- 253493.