एकलहरे ग्रामपंचायतीचा कारभार ग्रामसेवक आणि काही सदस्यांच्या लहरीवर

एकलहरे ग्रामपंचायतीचा कारभार ग्रामसेवक आणि काही सदस्यांच्या लहरीवर
श्रीरामपूर(प्रतिनिधी):- तालुक्यातील एकलहरे ग्रामपंचायतीचा कारभार गावाच्या नावाप्रमाणेच ग्रामसेवक आणि काही मोजक्याच सदस्यांच्या एकहाती लहरीवर चालल्याचा अनुभव राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांना आला आहे.
ग्रामपंचायत हद्दीतील चारशे ते पाचशे लोकवस्ती असलेले आठवाडी हे ठिकाण ग्रामपंचायतीच्या सगळ्याच सुखसुविधांपासून वंचित असल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांनी सागर बेग यांच्याकडे केल्यानंतर या सर्व अचंबित करणाऱ्या गोष्टींचा उलगडा झाला.गोरगरीब लोकांना न्याय देण्यासाठी स्वतः सागर बेग यांनी एकलहरे ग्रामपंचायतीत जाऊन संपूर्ण इतंभूत माहिती घेतल्यानंतर उपस्थित सगळेच अवाक झाले.शेती महामंडळाच्या गट क्रमांक ५२ मध्ये गेल्या साठ वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या लोकांची आज तेथे दुसरी पीढी आयुष्य जगत आहे.पंतप्रधान इंदिरा गांधींच्या काळात म्हणजे तेथील लोकांच्या वाडवडीलांच्या काळात शासनाने मंजूर केलेल्या व शासनाने बांधून दिलेल्या घरात राहणाऱ्यांचे आज कुटुंब वाढले आहे आणि साठ वर्षांपूर्वीचे घरही जीर्ण झाले आहे म्हणून आम्हाला आहे तेथेच घरे बांधून द्यावेत ही त्यांची मागणी ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षितपणामुळे व त्यांनी शासनाकडे केलेल्या चुकीच्या मागणीमुळे आजपर्यंत मागे पडली आहे.
जलजीवन मिशन योजनेअंतर्गत खोदण्यात आलेली व गावाला पाणीपुरवठा करणारी शासकीय विहीर खाजगी जागेत घेण्याचा प्रतापही ग्रामपंचायतीने केलेला आहे.विहीर शासनाची पण रुबाब मात्र खाजगी जागा मालकाचा त्या विहिरीच्या पाण्यावर त्या जागा मालकाची शेतीही फुलवली जाते वीजबिलही ग्रामपंचायत भरते असा प्रकार त्याठिकाणी होत असल्याच्या तक्रारी देखील ग्रामस्थांनी केलेल्या आहेत. एका स्थानिक ग्रामस्थाने तर विहिरीवरचा मुरूम देखील ग्रामसेवकांनी विकल्याचा स्पष्ट आरोप थेट उपविभागीय अधिकारी किरण सावंत यांच्यासमोरच केल्याने उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात काही काळ शांतता पसरली.
एकलहरे ग्रामपंचायत ग्रामसेवक व सदस्य यांच्या उपस्थितीत आठवाडी भागातील पन्नास ते साठजण राष्ट्रीय श्रीराम संघाचे समीर माळवे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी तथा प्रांत कार्यालयात बैठकीला उपस्थित होते.शेती महामंडळाच्या जमिनीबाबत आमच्या कार्यालयाला मर्यादा येत असल्यातरी सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन यावेळी प्रांत अधिकारी किरण सावंत यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिले.
ग्रामपंचायतीने घरकुलासाठी महामंडळाची जमीन मिळावी असा ठराव दिल्यास शासनाकडे तसा प्रस्ताव पाठवण्यात येईल असे सांगून प्रांत अधिकारी किरण सावंत यांनी ग्रामसेवकांना प्रत्यक्ष व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे यांना फोनद्वारे तशा सूचना दिल्या आहेत.प्रस्ताव शासनाने मंजूर केला तर ठीक अन्यथा ग्रामपंचायतीसाठी मंजूर करण्यात आलेली दहा एकर गावठाण जमिनीवर आठवाडी ग्रामस्थांना प्राधान्याने घरे बांधून देण्याचा शब्द किरण सावंत यांनी दिला आहे.याप्रसंगी माजी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकला खैरे,दिलीप गांगुर्डे,अनिल माळी,गणेश खैरे,नाना निकम,लक्ष्मण गव्हाणे,अशोक हेलांगे, सुदाम बर्डे,अशोक मोरे,सुनील पवार,राहुल अंभोरे,यांच्यासह आठवाडी भागातील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.



