उन्हाळी सुट्टी* विशेषतः

*उन्हाळी सुट्टी*
एप्रिल महिना संपत आला की उन्हाळी सुट्टीचे वेध लागायचे. रेडिओवर लागणारे
*झुक झुक आगीनगाडी
धुरांचा रेषा हवेत सोडी
पळती झाडे पाहूया
मामाच्या गावाला जाऊया*
हे गीत जरी आगगाडीने मामाच्या गावाला जावे लागत नसले तरी मन मात्र धावतपळत वझुकझुक गाडीसोबत मामाच्या गावाला जायचे. त्या वेळी मामाच्या गावाला एसटी किंवा बैलगाडीत बसून जावे लागायचे. एसटीत पळणारी झाडे पाहण्याचा आणि बैलगाडीत खडखड करणारे चाक,बैलाच्या गळ्यातील घुंगुरमाळाचा आवाज ऐकत प्रवास करण्याचा आनंद काही औरच होता.वेगवेगळ्या नात्यांची सुरेख गुंफण होती.ओढ, प्रेम,वात्स्यल्य, भावनेचा ओलावा होता.सुट्टी म्हणजे मस्त आनंद मौजमजा असं वाटायचं.झाडावर सरसर चढणं, सुरपारंब्याचे खेळ खेळणे, दमून शेवटी त्याच झाडावरील कैरी काढून त्याला तिखट मीठ तिखट लावून हुश्श हुश्श करत खाणं. आईच्या जुन्या साडीचा किंवा गोठ्यातल्या जनावरांचा जुना झालेला कासरा झाडाला बांधून झोके घेणं भारी वाटायचं.,झोका उंच उंच नेण्यासाठी चढाओढ लागायची.झोका घेता घेता कासरा तुटायचा. धपकन खाली पडलं तरी त्याचं काहीच वाटायचे नाही. तेवढ्या पुरता हशा पिकायचा. लागलेल्या भागाला हातांनी चोळत चोळत आणि पुढचा खेळ खेळण्यासाठी मन तयार असायचं.भातुकलीचा खेळही झाडाच्या गार सावलीत रंगायचा.त्याला आम्ही भांडीकुंडीचा खेळ म्हणायचो.त्यावेळी वेगळी भांडी खेळ खेळण्यासाठी नसायची.त्या खेळात संक्रातीची वापरून झालेली बोळकी भांडी म्हणून वापरली जायची. चिंचेचा कोवळी पाने दगडावर चेचून जेवण बनवलं जायचं. आईची फाटकी साडी नेसून खेळातली आई तयार व्हायची. बहुतेक खेळ हा कुटूंब आणि शाळा यावरच असायचा.गुरुजी किंवा बाई मीच होणार यासाठी भांडणे लागायची.खेळ इतका रंगायचा की काळ वेळेचे भान राहायचे नाही. पोटात कावळे ओरडायला लागले की मात्र घर आठवायचे.
खाण्यासाठी हेच हवं असा अट्टहास नसायचा.जे घरात असेल ते अगदी आनंदाने खाल्लं जायचं.आमटी भाकरीचा काला सोबत ताकाचे घोट घेत भुरके ओढले जायचे.अगदी खर्डा भाकर किंवा तेल तिखट कांदा हे खाण्यासाठी पुरेसं असायचं.त्या स्वादिष्ट जेवणाची चव आता कशालाच येत नाही.
पोहण्याचे धडेही सुट्टीच्या काळातच मोठयाकडून लहानांना दिले जायचे.जे नवीन शिकणार आहेत त्याच्या मनात प्रचंड भीती असायची. ज्याला पोहायला येते त्याच्या चेहऱ्यावर मात्र प्रचंड आत्मविश्वास अगदी मोठी कामगिरी पार पडावी तसा.नवशिक्याला ओढून न्यायला न सांगता बालसैनिक तयारच असायचे. त्यांना कोणतीही सूचना द्यावी लागत नसे. शिकणार्याचे घाबरून जमिनीत रुतणारे पाय अन पसरलेलं भोकांड, नाकातून गळणारी नाळ या गोष्टीत सवंगडी
“आता कसं हुतय”
म्हणत आनंद घ्यायची.ज्याच्याकडे पोहण्याचे कौशल्य आहे ते मात्र उंचावरून उडी मारणं, पाण्यात सूर पाटी खेळ खेळणं हे प्रकार करायचे. पोहून पोहून जाम भूक लागायची.खपली गव्हाचा केलेला सांजा दूध ,तूप यावर बच्चे कंपनी तुटून पडायची.
दुपारच्या उन्हात झाडाखाली रंगलेल्या मोठ्याच्या गप्पा ती कान देऊन ऐकायची. त्या गप्पात अनेक विषय असायचे.शेतीभाती, जत्राखेत्रा, पाहुणे राऊळे, अनेक सोसलेले उन्हाळे पावसाळे.त्यामुळे मुलांना न शिकवता, सांगताही अनेक गोष्टीचे ज्ञान आपोआप व्हायचे.
उन्हाळी कामे करण्यात महिला वर्ग दंग असायचा. कुरवड्या, भातुड्या ,सांडगे, शेवया इ.करून त्या दमून जायच्या. कुरवड्याचे शेजलेलं आंबूस पीठ खायचा मोह काही आवरायचा नाही. करपलेल्या पिठाचे सांडगे संध्याकाळ पर्यंत शिल्लक राहतच नव्हते.खाटेवर घातलेल्या कुरवड्या म्हणजे आकाशीचे चांदणं जमिनीवर उतरल्यागत वाटायचे. वाकळ शिवायला बाया घराच्या पडवीत बसायच्या. जाणती स्त्री इतर सखींना पाल कसे घालावे, टाके कसे घालावे याचे ज्ञान द्यायची. मनातलं सुख दुःखही तिथेच वाकळ शिवता शिवता बाहेर पडत होतं.आणि मनही मोकळं होत होतं.
रात्रीच्या चांदण्यात जेवण्याच्या पंगती पडायच्या. एकमेकांना घासातला दिला जायचा.भरलं वांगं,चकूल्या,केळीचे शिकरण, आमरस पोळीचा छान बेत असायचा.मनसोक्तपणे खाऊन झाल्यावर वाऱ्याच्या मंद झोतावर गप्पा मारतच डुलका लागायचा.
सुट्टीत अनेक नातीगोती एकत्र गोळा व्हायची.मुलांना नात्यातील प्रेम,आपुलकी, जिव्हाळा या भावनांची आपसूकच रुजवनूक व्हायची. स्वार्थ, मीपणा या गोष्टी बाजूला पडायच्या.उन्हाळ्याची सुट्टी संपूच नये असं आतून वाटायचं. एकमेकांना सोडून आपापल्या गावी जाताना कंठ दाटून यायचा.परत लवकरच भेटू म्हणत निरोप दिला जायचा.
लेखिका-©®रंजना सानप