कुख्यात गुंड शरद मोहोळ याची लग्नाच्या वाढदिवशी भरदुपारी गोळ्या झाडून हत्या.

कुख्यात गुंड शरद मोहोळ याची लग्नाच्या वाढदिवशी भरदुपारी गोळ्या झाडून हत्या.
कुख्यात गुंड शरद मोहोळ याची लग्नाच्या वाढदिवशी भरदुपारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. शरद मोहोळवर अज्ञात हल्लेखोरांनी कोथरूड इथं गोळीबार केला.यात मोहोळला चार गोळ्या लागल्या असल्याची माहिती समोर आली आहे. त्याला तातडीने वनाज सह्याद्री हॉस्पिटलला दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या हत्येनंतर मोहोळ तालुक्यातील एका टोळीचं नाव समोर आलं आहे. दोन वर्षापूर्वी या दोन टोळींमध्ये गँगवार झाल्याची घटना घडली होती.
दोन वर्षापूर्वी दोन गँगमध्ये टोळीयुद्ध
पुण्यातील गँगस्टर शरद मोहोळ आणि विठ्ठल शेलार यांच्यात फेब्रुवारी 2022 मध्ये व्यावसाईक वर्चस्ववादातून टोळी युद्धाचा भडका उडाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद मोहोळच्या सांगण्यावरून त्याच्या टोळीतील सदस्यांनी विठ्ठल शेलारवर हल्ला केला होता. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंड विठ्ठल शेलार याने व्यावसायिक वादातून हगवणे याला पिस्तुलाचा धाक दाखवून धमकी दिली होती. त्यामुळे गँगस्टर शरद मोहोळ याच्या सांगण्यावरुन सिद्धेश हगवणे, मल्हारी मसुगडे, आलोक भालेराव व त्यांच्या साथीदारांनी विठ्ठल शेलार व त्याचे साथीदार राधा चौकात असल्याचे समजून तेथे गेले. त्यावेळी तेथून एक गाडी जात होती. त्यात बसलेल्या विठ्ठल शेलारवर आणि त्याच्या साथीदारांवर दगड व कुंड्या फेकून मारल्या. तसंच राधा हॉटेल व तेथून येणार्या जाणार्या लोकांच्या जीवाची पर्वा न करता रोडवर दगडफेक केली. हा प्रकार समजताच हिंजवडी पोलीस घटनास्थळी धावून गेले. तोपर्यंत टोळके तेथून पळून गेले होते, ही घटना फेब्रुवारी 2022 मध्ये जवडी परिसरात घडली होती. मात्र, दोन्ही गुंडांची दहशत एवढी आहे की त्याबाबत एकही नागरिक तक्रार द्यायला पुढे आला नाही. शेवटी पोलिसांनी स्वतःच पुरावे गोळा केले आणि शरद मोहळ आणि त्याच्या साथीदारा विरुद्ध गुन्हे दाखल केले होते.
पुण्यातील कुख्यात गुंड म्हणून शरद मोहोळची ओळख आहे. शरद मोहोळ या टोळीने सरपंचाचा अपहरण करुन खंडणी उकळल्या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती. मोहोळ व आलोक भालेरावला येरवडा कारागृहातील अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी दहशतवादी कातिल सिद्दीकी याचा नाडीने गळा आवळून खून केला होता. या खटल्यातून त्यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर विठ्ठल शेलार हा मुळशी तालुक्यातील गुंड आहे. शेलार विरुद्ध खून, अपहरण, दरोड्याची तयारी आदी गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्यात आली होती.