राहुरी शहर हद्दीतील पेठेत एका पतसंस्थेत कोटींचा घोटाळा झाल्याची चर्चा

राहुरी शहर हद्दीतील पेठेत एका पतसंस्थेत कोटींचा घोटाळा झाल्याची चर्चा
राहुरी शहर हद्दीतील पेठेत एका पतसंस्थेत कोटींचा घोटाळा झाल्याची चर्चा सध्या राहुरी तालुक्यात सुरू आहे. या प्रकारामुळे ठेवीदारांचे धाबे दणाणले आहेत. मात्र कर्जदार आनंदाने उड्या मारत असल्याची माहिती समोर आली आहे.
काही वर्षापूर्वी राहुरी शहर हद्दीत मोठ्या थाटा माटात या पतसंस्थेचे उद्घाटन झाले होते. शिक्षक, पत्रकार, व्यापारी, शेतकरी, तसेच इतर नोकरदार वर्ग हा पतसंस्थेचा संचालक वर्ग आहे. त्यामुळे काही काळातच ही पतसंस्था नावारूपास आली होती. संचालक मंडळात प्रतिष्ठित लोकं असल्याने पतसंस्थेची ठेव मोठ्या प्रमाणावर होती. परंतू अचानक ती पतसंस्थेत गोलमाल झाल्याची खबर बाहेर आली. संचालक मंडळ, ठेवीदार व कर्जदार यांच्यात पतसंस्थे विषयी वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. त्या पतसंस्थेच्या माजी चेअरमनकडून अशी माहिती मिळाली कि, पतसंस्थेत एकूण साडे आठ कोटी रूपये ठेव आहे. तर साडेनऊ कोटी पतसंस्थेला कर्ज येणे बाकी आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पतसंस्था सुमारे एक कोट रूपये नफ्यात आहे.
मात्र संचालक मंडळाचे असे म्हणणे आहे कि, मॅनेजरने पतसंस्थेत सुमारे तीन कोटी रूपयांचा अफरातफर केलाय. मात्र त्या पतसंस्थेचे ऑडिट झाले असता संबंधित ऑडिटरने सांगितले कि, २०२०- २१ मधील पतसंस्थेच्या लेखापरीक्षण कालावधीत ४० लाख ८६ हजार रूपये इतका अपहार दिसून आला. या प्रकरणास संस्थेचे कर्मचारी किंवा कोणीही व्यक्ती जबाबदार असतील त्यांना कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असे म्हटले आहे.
मात्र संचालक मंडळ याला मान्य करीत नसून मॅनेजर ने अफरातफर केल्याचा आरोप करीत आहेत. तसेच पतसंस्थेचे पुन्हा ऑडिट करण्याचे ते सांगत आहेत.
एकिकडे संचालक मंडळ मॅनेजरवर घोटाळा केल्याचा आरोप करीत आहे. मात्र त्या मॅनेजरचा २६ डिसेंबर २०२० रोजी संचालक मंडळाने राजीनामा मंजूर केलाय. तसेच पतसंस्थेने मंजूर केलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे कि, दिनांक ७ नोव्हेंबर २०२० व दिनांक २६ डिसेंबर २०२० च्या संचालक मंडळाच्या ठरावा नुसार मॅनेजरचा राजीनामा मंजूर करण्यात आला. आजच्या तपासणी नुसार आपणाकडे कोणतेही प्रकारे येणे देणे बाकी नाही. संचालक मंडळाच्या ठरावा नुसार कोणतेही कागदपत्रे व रक्कम येणे नाही. असा मजकूर पतसंस्थेच्या चेअरमन ने सहीनिशी दिलेल्या राजीनामा पत्रात नमूद केला आहे. एवढ्या मोठ्या प्रकारा नंतरही पतसंस्थेचा भोंगळ कारभार सुरूच आहे. कर्ज नियमित भरणाऱ्या व कर्ज पूर्ण भरणाऱ्या लोकांना नोटीस बजावून कर्ज वसूली मागणी पतसंस्थेकडून होत आहे. या प्रकाराचा अनेक जणांना मनस्ताप होत आहे.
मात्र या प्रकारामुळे पतसंस्थेत झालेला कोटी रूपयांचा घोटाळा समोर येत आहे. ठेवीदारांचे धाबे दणाणले आहेत. प्रत्येक ठेवीदाराचे लाखो रूपयांची रक्कम आहे. एवढा पैसा ठेवीदारांकडे आला कोठून याचा ताळमेळ नसल्याने अद्याप कोणी तक्रार करण्यास समोर आले नाही. काही ठेवीदारांवर डाॅक्टरचे उपचार घेण्याची वेळ आली. तर कर्जदार मात्र आनंदात असल्याची माहिती मिळत आहे.