*कृषीपंपाच्या विज तोडणी विरोधात शेतकरी संतप्त*

*महावितरणच्या विरोधात विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे धरणे आंदोलन*
*कृषीपंपाच्या विज तोडणी विरोधात शेतकरी संतप्त*
महावितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी आणि विज ग्राहक त्रस्त झाले आहेत. पिकांना पाणी देण्याच्या दिवसात महावितरणकडून कृषीपंपाचे विज कनेक्शन तोडले जात आहे. एकीकडे मुख्यमंत्री शेतकऱ्यांची विज तोडू नका असे जाहिर सांगत असताना महावितरण मात्र शेतकऱ्यांचे विज कनेक्शन तोडत आहे, यामुळे शेतकरी संतप्त झाला असून शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या संदर्भात विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली गेवराई राष्ट्रवादीच्यावतीने शुक्रवार, दि.१८ रोजी सकाळी ११ वाजता महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
कोरोना संक्रमणाच्या कठीण काळानंतर शेतकरी सावरत असताना महावितरणकडून कृषीपंपाच्या विज तोडणीचा शॉक त्यांना दिला जात आहे. शेतकऱ्यांकडील थकबाकी वसुल करण्यासाठी महावितरणने एैन पिकाला पाणी देण्याच्या दिवसांत विज तोडणी सुरु करून शेतकऱ्यांना खिंडीत गाठले आहे. एकीकडे योग्य दाबाने विज पुरवठा होत नाही, दिवसभरात सतत भारनियमन केले जाते, नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर दुरुस्त होत नाहीत, सातत्याने लाईन ट्रीप होते, ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी अक्षरशः वर्गणी करून शेतकऱ्यांना पैसे द्यावे लागतात, ३३ के.व्ही.उपकेंद्राची दुरुस्ती होत नाही, खेडेगावात विज वाहक तारा लोमकाळत असून धोकादायक झाले आहे यांसह अनेक समस्या असताना केवळ शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम महावितरण कंपनीकडून होत असल्याचा आरोप विजयसिंह पंडित यांनी केला आहे. सध्याच्या राज्यकर्त्यांकडून या बाबत कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचेही विजयसिंह पंडित यांनी सांगितले.
गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने शुक्रवार, दि.१८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता उपअभियंता, महावितरण यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसह शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा यानिमित्ताने निषेध करून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी हे आंदोलन केले जाणार असल्याचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी बाजार समितीचे सभापती जगनपाटील काळे, जयभवानीचे व्हाईस चेअरमन जगन्नाथ शिंदे, खरेदीविक्री संघाचे अध्यक्ष संग्राम आहेर, जिल्हा परिषद सदस्य फुलचंद बोरकर, माजी सभापती बाबुराव जाधव, बाळासाहेब मस्के, कुमारराव ढाकणे, भरतराव खरात, बबनराव मुळे, अप्पासाहेब गव्हाणे, पाटीलबा मस्के, बप्पासाहेब मोटे, मोहम्मद गौस, उपसभापती शाम मुळे, नंदकुमार गोर्डे, परिक्षित जाधव, सुभाष मस्के, श्रीराम आरगडे, बळीराम खरात, अण्णा गवारे, डॉ.विजयकुमार घाडगे, पांडुरंग कोळेकर, संभाजी पवळ, राजेंद्र वारंगे, विकास सानप, शाम येवले, दिपक आतकरे, ऋषिकेश बेदरे, दत्ता दाभाडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.